महाराष्ट्र ही संतांची संपन्न जन्मभूमी आणि कर्मभूमी असून या मातीला भागवत धर्माची, अर्थात संतांच्या विचारांची आणि आचारांची जोपासना करणाऱ्या वारकरी धर्माची उज्वल परंपरा लाभली आहे. विश्व मानवतेला गवसणी घालणारी वैश्विक प्रार्थना याच भूमीतून प्रथम मराठी भाषेत उद्घोषित झाली. योगियांचे शिरोमणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी येथे विश्वधर्म मंदिराचा पाया रचला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या मंदिराच्या कळसस्थानी विराजमान झाले. सातशे वर्षांपूर्वी सुरू झालेली ही वारकरी धर्माची परंपरा आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. समग्र प्राणीमात्रांच्या ऐक्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करणारे हे समताप्रधान तत्त्वज्ञान सर्वांनाच माणुसकीची साद घालत आहे. जीवनातील अंतिम ध्येय गाठण्यासाठी अत्यंत सुलभ आणि सोपी आध्यात्मिक वाटचाल वारकरी धर्माने मांडली असून "हे विश्वची माझे घर" किंवा "किंबहुना चराचर आपणची जाहला" अशी अद्वैत अनुभूती देणारे हे महान तत्त्वज्ञान म्हणजे महाराष्ट्राचे खरे सांस्कृतिक वैभव आहे.
ज्ञानेश्वरांची 'ज्ञानेश्वरी', तुकोबांची 'अभंग गाथा' आणि नाथांचे 'भागवत' ही या धर्माची प्रस्थानत्रयी मानली जाते. या ग्रंथांसोबतच गोरोबा कुंभार, चोखोबा, निळोबा, सावता माळी, जनाबाई आणि कान्होपात्रा यांसारख्या विविध जाती-धर्मातील संतांच्या अभंग रचनांनी या भक्तीच्या महासागरात मोलाची भर घातली आहे. संत नामदेवांनी तर "नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥" असे ब्रीद घेऊन हे तत्त्वज्ञान भारतभर प्रत्यक्ष साकारले. बाराव्या शतकातील ज्ञानेश्वरांच्या साहित्याने मराठी भाषेला अक्षर वैभवाचे लेणे चढवले, तर तुकोबांच्या गाथेने जनसामान्यांच्या मनात विठ्ठल भक्तीचे बीजारोपण केले. वारकरी धर्माची सर्वसमावेशकता, आचरण सुलभता आणि अभंगांची रसाळ भाषा यामुळेच हा धर्म तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचला आणि त्याचा विस्तार झाला.
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि तिथला भक्ती संप्रदाय हा मराठी संस्कृतीचा मूळ गाभा ठरला आहे. महाराष्ट्रात अवतरलेल्या जगद्गुरु तुकोबारायांनी या वारकरी धर्मावर सुवर्णाचा कळस चढवला आणि या भक्तीच्या लाटेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. महाराष्ट्राच्या मातीत आणि माणसाच्या मनात बीजरूपाने पूर्वीपासून वसत असलेल्या वारकरी भक्तीभावाला संतांच्या विचारांचे खतपाणी मिळाले आणि त्यातून वारकरी धर्माचा एक अवाढव्य वटवृक्ष फोफावला. विविध जातीत आणि विविध भागात अवतरलेल्या संतांनी या वटवृक्षाच्या पारंब्यांप्रमाणे कार्य करून भक्तीचे तत्त्वज्ञान घराघरात पोहोचवले. जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रभावळीतील चौदा टाळकरी आणि त्यांचे शिष्य निळोबारायांनी वारकरी धर्माचा हा ध्वज सदैव फडकवत ठेवला आहे. आजही ही परंपरा तितकीच चैतन्यदायी असून ती समाजाला समता, शांती आणि निसर्ग रक्षणाचा मार्ग दाखवत आहे. हाच वारसा जपण्यासाठी आज संतभूमीचे रक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे.