Nov 20 2025
|
12:09:49am
  • English
संतभूमी संरक्षक संघर्ष समिती
संतभूमी संरक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य
  • मुख्यपृष्ठ
  • आमच्याविषयी
    • समितीची माहिती व उद्दिष्टे
    • कार्य
    • समिती संस्थापक
    • आवाहने आणि निवेदने
    • समितीचे निवेदन
  • मीडिया
    • व्हिडिओ
    • फोटो गॅलरी
  • बातमी
    • वर्तमानपत्रे
    • डिजिटल मीडिया
  • वारकरी धर्म
  • कागदपत्रे
  • संपर्क
ई-बुक

वारकरी धर्म

  1. मुख्यपृष्ठ
  2. वारकरी धर्म

    महाराष्ट्र ही संतांची संपन्न जन्म कर्मभूमी आहे. या संतभूमीला भागवत धर्माची अर्थात संतांचा, त्यांच्या विचारांचा व आचारांचा पाईक घडवणाऱ्या वारकरी धर्माची उज्वल परंपरा लाभली आहे. विश्व मानवतेला गवसणी घालणारी वैश्विक प्रार्थना येथेच मराठी भाषेत प्रथमत: उद्घोषित झाली. योगियांचे शिरोमणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी इथे विश्वधर्म मंदिराचा पाया रचला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या मंदिराचे कळसस्थानी विराजमान झाले.

    सातशे वर्षापुर्वी सुरु झालेली वारकरी धर्माची उज्वल परंपरा, आज जगाच्या कानाकोपर्यात पोहचती आहे. जगभरातल्या मानवतेलाच नव्हे तर समग्र प्राणी मात्रांच्या ऐक्यासाठी प्रार्थना करणारे हे समताप्रधान तत्वज्ञान म्हणूनच सर्वांना साद घालत आहे. जीवनातील अंतिम ध्येय आणि त्यासाठी अनुकरणीय अध्यात्मिक वाटचाल, याचे सुलभ-सोपे विचेचन याच धर्मात सांगण्यात आले आहे. "हे विश्वची माझे घर","किंबहुना चराचर आपणची जाहला" अशी अनुभूती देणारे हे तत्वज्ञान आहे. ज्ञानाईची "ज्ञानेश्वरी", तुकोबांची "अभंग गाथा" व नाथांचे "भागवत" ही या धर्माची प्रस्थानत्रयी आहे.गोरोबा, चोखोबा, निळोबा, सावंता माळी, जनाबाई, कान्होपात्रा इत्यादी संत मांदियाळीतील अभंग रचनांनी त्यात मोलाची भर घातली. "नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥" हे अभंग ब्रीद संत नामदेवांनी भारतभर साकार केले. संत बहिणाबाईंनी या धर्ममंदिराचे यथार्थ वर्णन केले आहे.

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत निवृत्तीनाथ, श्री संत सोपान महाराज, ब्रहमचित्कला मुक्ताबाई या चार भावंडाबरोबरच भक्त शिरोमणी नामदेव महाराज, श्री संत सावता माळी महाराज, श्री संत चोखोबा व या संत प्रभावळीतील अनेक संतानी बाराव्या शतकात वारकरी धर्म समृध्द केला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीभगवतगीतेचा केलेला मराठी भावार्थ अर्थात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव चांगदेव पासष्टी व अभंग गाथा व इतरही संतांचे साक्षात्कारी अनुभूतीप्रधान अभंग हे मराठी भाषेचे अक्षर वैभव ठरले. याच काळात महाराष्ट्रात सर्वदूर तळागाळापर्यत श्री विठठल भक्ती पोहचली. वारकरी धर्माची सर्वसमावेशकता आचरण सुलभता व अभंगाची भाषा यामुळे वारकरी धर्माचा विस्तार झाला.

    पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, त्याला मानणारा भक्तिसंप्रदाय आणि त्याचा महिमा वर्णन करणारे अद्वितीय असे संतवाङ्मय हा मराठी संस्कृतीचा गाभाच आहे, असे म्हणावयास हरकत नाही. महाराष्ट्रात वारकरी धर्मातअवतरलेल्या जगदगुरू तुकोबारायांनी वारकरी धर्मावर सुवर्णाचा कळस चढवला. या वारकरी धर्माच्या लाटेने संपुर्ण महाराष्ट्र ढवळुन काढला. या महाराष्ट्राच्या मातीत, माणसाच्या मनात बीजरुपाने पुर्वीपासुन बसणाऱ्या वारकरी भक्तीभावाला खतपाणी मिळुन महाराष्ट्रा व्यापी वारकरी धर्माचा वटवृक्ष फोफावला. विविध जातीत, विविध भागात अवतरलेल्या संतांनी वटवृक्षाच्या पारब्याप्रमाणे वारकरी धर्माचे तत्वज्ञान त्या भागात पोहचवलेच व वारकरी धर्माला खंबीर आधार दिला. या कालावधीत जगदगुरू तुकोबारायांच्या प्रभावळीतील चौदा टाळकर्यांनी व शिष्य निळोबारायांनी वारकरी धर्माचा ध्वज फडकवत ठेवला.

संतभूमी संरक्षक संघर्ष समिती,

महाराष्ट्र राज्य.

इतर लिंक

  • गोपनीयता धोरण
  • साईटमॅप
  • निवेदन
  • समिती संस्थापक
  • बातमी
  • वर्तमान पत्रांमध्ये

Social Media

  • Youtube
  • Facebook
  • Instagram
  • WhatsApp Chanel
  • Telegram Chanel
Copyright © 2025, संतभूमी संरक्षक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य.

Developed by Riverlake

बंद करा Okay !