एकांतस्वरूप साधनाभूमी तीर्थक्षेत्रांचा विकास हा पर्यटन क्षेत्रासारखा करावयाचा नसतो तर त्या तीर्थक्षेत्रांची पुर्वपिठीका लक्षात घेऊन ही संतपीठे अबाधित ठेवून तप-ज्ञानदान सेवेची चालती-बोलती सजीव विद्यापीठे कशी होतील हा प्रामुख्याने विचार करून तद्अनुकुल करावयाचा असतो कारण तीर्थक्षेत्र हे स्वभावत: शारिरीक, मानसिक व अध्यात्मिक स्वास्थ्याची चैतन्यभूमी असते तसेच धार्मिक आणि सामाजिक सलोख्यासाठीची उर्जा येथूनच प्राप्त होते म्हणून त्यांच्या संरक्षणाची, संगोपनाची सर्वस्व जबाबदारी सरकारची आहे. परंतू या तत्वाचे पालन देहू-आळंदी,भंडारा-भामचंद्र डोंगर परिसरात सरकारने केलेले नाही.
तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली जगदगुरु संत तुकोबारायांच्या साधनाभूमी श्रीक्षेत्र भंडारा डोंगराचे अखंडत्व व पवित्र सौंदर्य नष्ट करून त्याचप्रमाणे एम.आय.डी.सी., खाण उत्खननामुळे तपोभूमी भामचंद्र डोंगराचे अस्तित्व धोक्यात आणुन तुकोबांच्या या अध्यात्मिक चिंतनभूमीची घोर विटंबना सरकारने चालवलेली आहे. सरकारच्या अभयहस्ते तुकोबांच्या या एकांतिक तपोभूमीत लॉजिंग, हॉटेल आदी धंदे टाकण्याच्या या भोगवादी प्रवृत्तीच्या व एकांगी औद्योगिकीकरणाच्या विरोधात "संतभूमी संरक्षक संघर्ष समिती" ने वारकरी सांप्रदायातील भक्तांच्या अनेक संघटनांच्या व संत विचार प्रमाण मानून चालणाऱ्या थोरांच्या एकीतून बंड पुकारलेने व त्यांचे हे डाव उधळून लावण्याचे प्रयत्न चालू केल्याने आपली दुकाने आता बंद होणार या भितीने हैराण झालेले हे लोकच आता वारकरी सांप्रदायात दुहीची बीजे पेरून संघर्ष समिती विकाच्या आड येत आहे असा खोटा डांगोरा पिटून अपप्रचाराने भाविक भक्तजनांची दिशाभूल करण्याचा निष्फळ प्रयत्न करताना दिसत आहेत.
सरकारचे तीर्थक्षेत्र विकास आराखडयामध्ये यात्रेकरूंसाठी, वारकऱ्यांच्या वारीसाठी कायमस्वरुपी कोणतेही ठोस असे आरक्षित व सुरक्षित धोरण नाही. त्यामुळे सरकारच्या व वरील चंगळवादी लोकांच्या विरोधात गेली कित्येक वर्षे संघर्ष समितीच्या माध्यमातून बेभान होऊन आम्ही रान उठवलेले आहे व पुढे उठवीत राहणार आहोत. कारण, विकासाच्या नावाखाली तुकोबांच्या या तपोभूमी डोंगरांची आता तोडफ़ोड सुरु असून महाराजांचा येणे "सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥" असा प्राचीन कालापासूनचा वनश्रीयुक्त साधकांचा एकांत आता कायमचा इतिहास जमा होणार असून तो होऊ नये यासाठी "सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥" व संतपीठ रक्षणासाठी पुन:श्च कटीबद्ध व्हा !. तरच सत्-असत् मधील या संघर्षाच्या परिणामातून विकासाचा खोटा डांगोरा पिटणाऱ्या सरकारला भानावर आणता येईल ! एवढे सामर्थ्य आम्हा वारकऱ्यांच्या अंगी आहे याचा स्वप्नातही कदाकाली आपल्याला विसर पडता कामा नये.
श्रीक्षेत्र भंडारा-भामचंद्र डोंगर परिसर हा वनश्रीयुक्त शांतीझोन म्हणून शासनाने आरक्षित करावा म्हणून संघर्ष समितीने शासनाकडे आहवालही पाठवला.... तो आतापर्यंत आमलात आणावयास हवा होता पण या मागणीबाबत शासनाने अक्षम्य दुर्लक्ष व कसुर केली आहे. म्हणून आता "आपुली आपण करा सोडवण ॥" या निर्धाराने "संतभूमी संरक्षक संघर्ष समिती" आपणास आवाहन करत आहे की, हरिच्या दासा उठ ! जागा हो ! एकत्र ये आणि "हरि तैसे हरीचे दास । नाही तया भय मोह चिंता आस ॥" किंवा "कास घालोनि बळकट । झालो कळिकाळावरी नीट ॥" या जगदगुरुंच्या वचनाला जागून परमपवित्र संतभूमीच्या रक्षणासाठी आयुष्याच्या समर्पणाची प्रतिज्ञा कर... आणि अमर हो !
तरी या सत्कार्यासाठी आपण सतर्कतेने आमच्या सतत संपर्काने राहून सहकार्य करावे म्हणजे "एकमेका साह्य करू । अवघे धरू सुपंथ ॥" हे महाराजांचे वचन आपल्या सर्वांच्या जीवनात सार्थ होईल.
संतभूमी संरक्षणासाठी समर्पित,
संतभूमी संरक्षक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य.